Monday, February 18, 2013

हिंदू जीवनदृष्टी आणि आजची स्त्री

बी. निवेदिता, राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी
महिला दिनानिमित्त लेख ...


हिंदू जीवनधारा आणि आजची परिस्थिती ध्यानात घेत महिलाविषयक चिंतन होणे आवश्यक आहे. शाश्‍वत (सनातन) तत्त्वांचे आजच्या काळात अनुसरण करायचे असेल तर ते कशा रीतीने करायचे, हे पाहणे म्हणजेच युगधर्म समजून घेणे होय. जसा काळ बदलतो, जीवनातली गुंतागुंत वाढते तसे शाश्‍वत तत्त्वांच्या प्रकाशात जीवनमूल्ये, जीवनव्यवस्था निश्‍चित कराव्या लागतात. ही शाश्‍वत मूल्ये कोणती आहेत?


मूळ गाभा

एकात्म जीवन दर्शन अथवा ‘व्हीजन ऑङ्ग वननेस’ हेच हिंदू जीवन दर्शनाचे मूळ शाश्‍वत तत्त्व (इनर कोअर) आहे. संपूर्ण अस्तित्व (एक्झीस्टन्स) हे आत्मचेतनेचे प्रगटीकरण आहे. एकच तत्त्व अनेक रूपांतून प्रगट झाले आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक घटकाचे विशेष स्थान आहे. प्रत्येकाचे प्रयोजन आहे. कोणीही निरर्थक नाही. मनुष्य हा स्वत:मध्ये एखादा स्वतंत्र (अनकनेक्टेड) घटक नाही. व्यक्ती ही मूलत: आत्मचेतना आहे. विकसित होणारी ही आत्मचेतनाच परिवार, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण सृष्टीचे रूप घेते. याचाच अर्थ असा की व्यक्तीचे विकसित रूप कुटुंब, कुटुंबाचे विकसित रूप समाज, समाजाचे विकसित रूप राष्ट्र आहे. राष्ट्र हे विश्‍वाचा अंग असल्यामुळे तिचे प्रयोजन विश्‍वकल्याणासाठी आहे. सृष्टीत इतकी विविधता असूनही याची चेतना, आत्मा एक आहे. हे एकात्म जीवन दर्शन किंवा व्हिजन ऑङ्ग वननेस हेच हिंदू जीवनधारेचे मूळ सनातन तत्त्व आहे.

एकात्म जीवन दर्शनाच्या प्रकाशात अन्य मुख्य तत्त्वे...

१. कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी हे सारे घटक एकमेकांशी जोडले गेलेले, परस्परसंबंधी व परस्परावलंबी आहेत. या अस्तित्वाची रचना मानवी शरीरासारखी आहे. जसे बाळाचे शरीर तयार होताना सुरुवातीला काही पेशी असतात, त्या पेशी ऊतींमध्ये (टिश्यू) विकसित होतात. ऊतींपासून अवयव तयार होतात. सारे अवयव क्रमश: विकसित होत मानवी शरीर तयार होेते, परंतु त्याची चेतना एकच असते. त्यामुळे सारे अवयव हे एकमेकांशी जोडले गेेलेले, परस्परसंबंधित आणि परस्परावलंबी असतात. याच प्रकारे हे अस्तित्व आणि त्यातील कुुटुंब, समाज, राष्ट्र यासारखे घटक परस्परांशी जोडलेले, परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत. 

२. या एकात्मतेची अनुभूती घेण्यासाठी प्रत्येक जीवात्मा हा त्याच्या विकासाच्या स्तराला अनुकूल शरीर धारण करतो.

३. जिथे परस्पर अनुबंध, परस्पर संबंध आणि परस्परावलंबन आहे तिथे स्पर्धा नाही किंवा तिथे समतेचा विषयही उपस्थित होत नाही.

४. प्रत्येकाने आपले जीवन या सृष्टीच्या समरसतेसाठी (की ज्यामध्ये राष्ट्र, समाज, कुटुंब इत्यादींचा समावेश आहे.) आणि एकात्मतेची अनुभूती घेण्यासठी आत्मविकासाच्या यात्रेत पुढे सरकण्यासाठी व्यतीत करायचे आहे.

५. आत्मविकासासाठी आपल्या संस्कृतीत चतुर्विध पुरुषार्थ आणि आश्रम व्यवस्था आहे. आजही या गोष्टी अत्यंत प्रासंगिक आहेत. आजच्या परिभाषेत या बाबी समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.

समता किंवा समानतेचा नव्हे तर एकात्मतेचा हा विषय आहे. ही तत्त्वे स्त्रीच्या संदर्भात समजून घेतली पाहिजेत. जीवात्मा हा लिंगविरहित असतो. परंतु आत्मविकासाच्या यात्रेत जेव्हा तो विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट शरीर धारण करतो, त्या शरीरात त्याला काही अनुभव अवश्य घ्यायचे आहेत.

त्यामुळे स्त्रीचे शरीर धारण केले असेल तर तिची काही वैशिष्ट्‌ये आहेत की ज्या पुरुषाच्या असू शकत नाहीत. त्यामुळे स्त्रीने पुरुषाशी तुलना करणे योग्य नाही. शरीरात हृदय जर किडनीचे काम करू लागला तर त्यात ना हृदयाचे ना किडनीचे ना संपूर्ण शरीराचे हित आहे. या तर्‍हेने जर पुरुषाने स्त्रीसारखा किंवा स्त्रीने पुरुषासारखा व्यवहार केला तर त्यात ना स्त्रीचे, ना पुरुषाचे ना समाजाचे भले होणार आहे.

तर प्रश्‍न असा उपस्थित होतो की स्त्री आणि पुरुषांच्या भूमिका कधीच बदलू नयेत असे आहे की काय? असे होणे तर शक्य नाही; आणि नाहीसुद्धा. काळानुसार, आवश्यकतेनुसार बदल तर होतच राहणार. आणखी एक प्रश्‍न पुढे येतो की स्त्री आणि पुरुष समान नाहीत काय? हिंदू दर्शनानुसार येथे समता किंवा समानतेचा मुद्दाच नाही; येथे एकात्मतेचा मुद्दा येतो. एकात्मतेत अधिकार आणि स्पर्धा नव्हे तर आत्मीयता असते. आणि आत्मीयता असेल तर मनुष्य आपलेपणाने, सहजतेने कर्तव्य निभावण्यासाठी समोर येतो. त्याचा कर्तव्यबोध हा दुसर्‍याच्या अधिकारांचे रक्षण करतो. ङ्गक्त अधिकाराची गोष्ट कुटुंब आणि समाजाला तोडते. एकात्मतेतून आलेला कर्तव्यबोध सार्‍या समष्टीला जोडतो.

समस्या महिलांच्या नाहीत तर आपल्या समाजाच्या आहेत. मुद्दा जेव्हा एकात्मतेचा असतो तेव्हा समस्या कधी केवळ एखाद्या घटकाची नसते. जसे शरीरात हृदयरोग असेल तर ती केवळ हृदयाची नव्हे, पूर्ण शरीराची समस्या असते. याच प्रकारे स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, घरगुती हिंसाचार, कुपोषण आदी केवळ महिलांच्या समस्या नाहीत. या सार्‍या आपल्या समाजाच्या समस्या आहेत, ज्या समस्यांचा बळी महिला ठरलीय. आणि समाजाच्या या समस्या का निर्माण झाल्या? कारण हिंदुत्वाच्या शाश्‍वत तत्त्वांच्या प्रकाशात आज आपल्या व्यवस्था कशा हव्या याचे चिंतन करण्यात समाज कमी पडला. पाश्‍चिमात्य विचारांच्या झगमगाटात समाज आपली सनातन मूल्ये विसरला आहे. 

आणखी एक कारण आहे - आजच्या समाज जीवनाची स्थिती ध्यानात न घेता जर समाजासमोर जुन्या आदर्श व्यवस्थांनाच आपण सांगत राहिलो तरीही लोक हिंदू जीवनधारेपासून दूर जातील. पूर्वी ही व्यवस्था खूप आदर्शवत् असली तरी ती आज व्यवहार्य नसल्याचा निष्कर्ष काढून लोक म्हणतील की हे सारं बोलायला ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात काय? त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात हिंदू जीवनदर्शन कसे आणता येईल, याचे चिंतन होण्याची खरी आवश्यकता आहे. 

स्त्रीचे कार्य, स्थान याचा विचार हिंदू दर्शनाच्या प्रकाशात करायचाच आहे परंतु हे पूर्ण हिंदू समाजाची स्थिती, उद्दिष्ट, आजच्या समस्या ध्यानात घेऊन करणे आवश्यक आहे. स्त्री समस्यांचे उत्तर केवळ स्त्रीयांमध्ये काम केल्याने नाही तर पूर्ण समाजाला संवेदनशील आणि सुसंस्कृत बनवण्यात आहे.स्त्रीच्या विशेष गुणांचे रक्षण करत आज व्यवस्थांमध्ये बदल घडवून आणायचे आहेत. उदाहरणार्थ - पूर्वी पती आणि पत्नींचे कर्तव्य पूर्णपणे वेगवेगळे होते. अर्थार्जन करणे, आर्थिक व्यवहार पाहणे इत्यादी बाहेरची कामे पतीची असायची. घर आणि मुलं सांभाळणे आदी कामे पत्नी करायची. आज स्त्री अर्थार्जनसुद्धा करतेय, इतकेच नाही तर ती मुलांचा अभ्यास, घरासाठी खरेदी आदी कामेही करतेय. अशा वेळी जर तिला जुने नियम सांगून घरातली सारी कामे तिनेच केली पाहिजेत, सर्वांची जेवणं झाल्यानंतरच तिने जेवले पाहिजे असे म्हटले जात असेल तर याला हिंदू चिंतन म्हणता येणार नाही. 

आपण एकात्मतेचा विचार करत असू तर पत्नीवरील कामाचा बोजा पाहून पती आपोआपच घरातल्या कामात मदतीला येईल. ही गोष्ट स्त्रीने अधिकाराची मागणी करून किंवा पुरुषाने संवेदनाहीन राहून शक्य नाही. ही गोष्ट तर एकमेकांप्रति एकात्मतेच्या अनुभूतीनेच होईल आणि ती समरसतापूर्ण असेल. 

बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की पती-पत्नी हे द्विदल दाण्याप्रमाणे असतात, दोन्ही मिळून जसा एक दाणा पूर्ण होतो तसेच पती-पत्नी मिळून एक पूर्ण मानव होतो. दोघांचा आत्मा एकच आहे. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये दोघांनी मिळूनच पार पाडायची आहेत. उद्देश हा की कुटुंब हे मुलांचे योग्य दृष्टीने सर्वांगीण विकास करणारे स्थान असावे आणि तीत स्त्रीची जे वैशिष्ट्य आहे की ती माता आहे, त्या वैशिष्ट्याचे रक्षणही व्हावे. येथे मातृत्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. कारण हिंदू दर्शनावर आधारित राष्ट्रकार्यासाठी कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा घटक म्हणून महिलांचे योगदान आहेच. आईच्या रूपाने जे कार्य आहे ते केवळ स्त्रीच करू शकते. त्यामुळे मातृत्व हे रक्षणीय आणि महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या दृष्टीने हे कसे करायचे यावर चिंतन करावे लागेल.

आणखी एक उदाहरण एकत्र कुटुंबपद्धतीचे आहे. आपण जर एकत्र कुटुंबपद्धतीचे गुणगान करत राहिलो तर माणूस विचार करू लागतो की, ‘मला नोकरीमुळे हे शक्य नाही. त्यामुळे हिंदू चिंतन आणि व्यवस्था पूर्वीच्या काळी आदर्श ठरल्या असतीलही परंतु आता त्या अव्यवहार्यच आहेत.’ कुटुंबाची एकात्मता तर राहिलीच पाहिजे पण आजच्या काळातली गुंतागुंतही ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे एकात्मता दर्शनाच्या प्रकाशात आज आम्ही काय केले पाहिजे याचे चिंतन झाले तर ते अधिक ङ्गलदायी असेल. नोकरी, शिक्षण यामुळे एकत्र कुटुंब राहू शकले नाही तरी सण, आजारपण, सुट्‌ट्यांचा काळ, कुलदेवता पूजन, जत्रा यासाठी संपूर्ण परिवार एकत्र येणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. याला स्थायी रूपही द्यावे लागेल तर हे व्यवहार्य होईल.

अस्तित्वाच्या सनातन नियमांविरुद्ध जीवन जगल्यास विनाश निश्‍चित आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,
‘ सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवण्यास रिकामे नाही मग तो समाज प्राचीन असो की आधुनिक, समाजानेच सत्यापुढे मान तुकवावयास  हवी, आणि ते शक्य नसेल तर मरणास तयार हवे.’     खंड ३, पृष्ठ ८४ 


हे सत्यही समजून घ्यावे लागेल. व्यक्तीवाद आणि भोगवाद यामुळे ज्या विकृती समाजात येत आहेत जसे लिव्ह इन रिलेशनशिप, सरोगेट मदर्स इ., त्याने समाजाची काय स्थिती होईल? या दृष्टीने आपण आपल्या सनातन तत्त्वांच्या प्रकाशात काय काय उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत याचे चिंतन आवश्यक आहे.

स्त्री ही गृहस्थाश्रमाची अधिष्ठात्री देवता आहे. ती कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. याचा अर्थ असा आहे का की तिचे कार्य कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे? तर असे मुळीच नाही. हिंदू दर्शनात कुटुंबाची संकल्पनाही विस्तारित होत होत समाज, राष्ट्र आणि संपूर्ण वसुधेला व्यापते - वसुधैव कुटुम्बकम्. स्त्रीकडे असे विशेष गुण आहेत की ज्यामुळे ती कुटुंबाचे त्याग आणि सेवेद्वारे वहन करते. हे गुण समाजधारणा आणि राष्ट्रपुनर्निर्माणासाठीही आवश्यक आहेत. गीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्येकातील ईश्‍वरत्वाविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की स्त्रीयांमधील ईश्‍वरत्व कीर्ति, श्री, वाक्, स्मृति, मेधा, धृति, क्षमा या सात गुणांनी प्रकाशित होते. हे सात गुण संस्कारक्षम कुटुंब, समाज धारणा आणि राष्ट्र पुनरुत्थानाच्या कार्यातही आवश्यक आहेत. भारताचे प्रयोजन संपूर्ण विश्‍वाला आध्यात्मिक जीवनपद्धती कशी असते याचे मार्गदर्शन करणे हे आहे. या दृष्टीने भारताचे पुनरुत्थान करायचे आहे. या आध्यात्मिक कार्यात विशेषकरून स्त्रीतील या सप्तशक्ती एकत्र आल्या पाहिजेत. अनेक कारणांमुळे स्त्रीचा समाजधारणा आणि राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य तसेच या निर्णयप्रक्रियेतील सहभाग समाप्त झाला, जो वेदकाळात होता. स्त्रीचे जे पूरक योगदान आहे ते मिळू शकले नाही. आपल्या अधोगतीचे हेही एक कारण आहे. राष्ट्रोन्नतीसाठी पुन्हा एकदा स्त्रीयांचा सहभाग आणि सहयोग आवश्यक आहे. हे स्वत:चे प्रयोजन स्त्रीयांनीही समजून घेण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण समाजानेच हे सत्य समजून घेऊन स्वीकारावे या दृष्टीने काम होण्याची आवश्यकता आहे.

अनुवाद : सिद्धाराम

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी